Wednesday, August 25, 2010

फेस्टिव्हल बोनान्झा

मुंबई विद्यापीठाच्या 43 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आणि समस्त युवा महोत्सव प्रेमींनी चर्चगेटचं क्लब हाऊस म्हणजेच विद्यापीठाचं कल्याण केंद्र गाठलं आहे. पात्रता फेरीतून उल्लेखनीय, अत्युत्तम स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले आणि आता यात सहभागी झालेल्या तुल्यबळ स्पर्धकांची, त्यांच्या विद्यालयांची टक्कर.. आणि गेल्या वर्षाची खुन्नस यातून पुन्हा एकदा नव्याने फेस्टिव्हल बोनान्झा सुरू होईल.

मुंबई विद्यापीठाच्या 43 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीला नुकतीच सुरुवात झाली आणि मुंबईतल्या समस्त युवा महोत्सवप्रेमींनी चर्चगेटचं क्लब हाऊस म्हणज विद्यापीठाचं कल्याण केंद्र गाठलं आहे. पुढे आठवडाभर जर तुम्ही त्यांना फोन केलात तर एकच उत्तर मिळेल, अरे जरा क्लब हाऊसमध्ये आहे रे. आज वन अ‍ॅक्टची फायनल आहे आणि उद्या स्किटची. एक काम कर नेक्स्ट वीकमध्ये पक्का भेटू. सध्या जरा बिझी आहे.

शिक्षण पूर्ण होऊन नोकरी-व्यवसायात रुळलेले कितीतरी एक्स-स्टुडन्ट एक दिवस तरी या काळात इथे हजेरी लावतात. 180 हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतलेल्या युवा महोत्सवाच्या पात्रता फेरीतून उल्लेखनीय, अत्युत्तम स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले आणि आता यात सहभागी झालेल्या तुल्यबळ स्पर्धकांची, त्यांच्या विद्यालयांची टक्कर.. आणि गेल्या वर्षाची खुन्नस पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. महाविद्यालयाला जिंकवण्यासाठीची जिद्द, जीव तोडून घेतलेली मेहनत हे सारं काही पुन्हा एकदा युवा महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार.

विद्यार्थी कल्याण केंद्रातील शाहीर अमरशेख सभागृहामध्ये टीव्ही व चित्रपट अभिनेता राजा शिवछत्रपतीफेम डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत 43 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीचा उद्घाटन सोहळा पार पडला.

आतापर्यंत वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी, भारतीय समूहगीत, मराठी एकांकिका स्पर्धा, क्लासिकल इन्स्ट्रमेंटल,ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग आदी स्पर्धा झाल्या. त्यापैकी नक्षलवाद : कारणे आणि उपायया विषयावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये काही विद्यार्थ्यांनी नक्षलिझमचा सखोल अभ्यास केल्याचं दिसून येत होतं. सदर स्पर्धेत रुपारेल महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचं, साठय़े महाविद्यालय, विलेपार्लेला द्वितीय तर वझे-केळकर महाविद्यालयाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. रांगोळी स्पर्धेत कणकवलीच्या एस.पी.के. महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर दुस-या आणि तिस-या स्थानाचा मान अनुक्रमे रचना संसद आणि ए.व्ही. श्रॉफ महाविद्यालयाला मिळाला. इन्स्ट्रमेंटलमध्ये डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला. एकांकिका स्पर्धा ही युवा महोत्सवातील मानाची स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या हाऊसफुल गर्दीत संपन्न झालेल्या मराठी एकांकिका स्पर्धेत रुईया महाविद्यालयाने बाजी मारली. व्रिडॉल सिम्प्सटम, नेट सॅव्ही आणि मोबाइल फ्रीक अर्थात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जंजाळात गुरफटलेल्या आजच्या पिढीची कथा सांगताना आज जग जवळ आलं तरी माणूस कसा दूर गेला याचं उल्लेखनीय सादरीकरण रुईया महाविद्यालयाने केलं. द्वितीय क्रमांक खालसा महाविद्यालय आणि जोशी बेडेकर महाविद्यालय यांना विभागून देण्यात आला तर चांगू काना ठाकूर महाविद्यालय (सीकेटी) याच्या ओम श्वानाय नम:या एकांकिकेला तृतीय क्रमांक देण्यात आला. 5 सप्टेंबपर्यंत चालणा-या अंतिम स्पर्धामध्ये हिंदी वन अ‍ॅक्ट अर्थात हिंदी एकांकिका स्पर्धा, मराठी आणि हिंदी स्किट फोक डान्स यासारख्या स्पर्धा आगामी आकर्षण ठरतील. तर मग मित्रहो, सज्ज व्हा युवा महोत्सवात सहभागी व्हायला. कदाचित त्यात तुमचंही नाव असेल

Tuesday, August 17, 2010

पार्टी कल्चर हवं कशाला?

एकीकडे रॅगिंगच्या विरोधात आवाज उठवणारी महाविद्यालयातील मॅनेजमेंट या ‘फ्रेशर्स पार्टी’चं नेहमीच स्वागत करत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने एका प्रख्यात महाविद्यालयाच्या सीनिअर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सो कॉल्ड फ्रेशर्स पार्टीमधून मद्यधुंद अवस्थेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे फ्रेशर्स पार्टीना पाठिंबा देणारी सारीच महाविद्यालयं या कन्सेप्टबाबत पुनर्विचार करण्यास प्रवृत्त झाली.

चार मित्र जमले आणि धमाल सुरू झाली की त्याबरोबर सुरू होते ती पार्टी. मग ती पार टीची म्हणजेच कट्टय़ावरच्या चहाची असो किंवा मग नाक्यावरच्या वडापावची.. आता मात्र पार्टीची व्याख्या बदलत चालली आहे.. कारण आता पार्टी म्हटलं की समोर उभी राहते ती केवळ ओली पार्टी. या अशा पावसाळी, भिजलेल्या कातरवेळी एक स्मॉल पेग होती.., सिगारेट पेटलेलीयाशिवाय कुठलीही पार्टी ही आम्हाला पार्टीच वाटत नाही. एकीकडे रॅगिंगच्या विरोधात आवाज उठवणारी महाविद्यालयातील मॅनेजमेंट या फ्रेशर्स पार्टीचं नेहमीच स्वागत करत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एका प्रख्यात महाविद्यालयाच्या सीनिअर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सो कॉल्ड फ्रेशर्स पार्टीमधून मद्यधुंद अवस्थेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे फ्रेशर्स पार्टीना पाठिंबा देणारी सारीच महाविद्यालयं या कन्सेप्टबाबत पुनर्विचार करण्यास प्रवृत्त झाली. कारण ब-याच महाविद्यालयांमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीत फ्रेशर्स पार्टी होते. त्यानंतर या मोठमोठय़ा बडय़ा कॉलेजेस्मधले सीनिअर्स स्टुडन्ट एखाद्या क्लब किंवा पबमध्ये वेगळी ग्रॅँड फ्रेशर्स पार्टी आयोजित करतात. कॉलेज मॅनेजमेंट याला पाठिंबा देत नसली तरी त्यांचा विरोधही नसतो. समुद्रात राहायचं असेल तर मोठय़ा माशांशी वैर करून चालणार नाही, या न्यायाने बहुतेक ज्युनिअर्स अशा पाटर्य़ाना उपस्थित राहतात. पुढच्या पार्टीपर्यंत या वातावरणाची सवय होते आणि वर्षभरात या सा-या वातावरणाची चटकच लागते. मग नवीन येणा-या विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या फ्रेशर्स पार्टीचा मूळ हेतू कुठेतरी मागेच हरवतो आणि समोर दिसतो तो व्यसनात आकंठ बुडालेला, आधुनिकतेच्या नावाखाली फॅशनच्या चिंध्यात लपेटलेला, शारीरिक व्याभिचाराने धुसर झालेला नवीन मार्ग.. आपल्या भविष्याची नवीन पहाट घडवण्यासाठी दाखल झालेले अनेक तरुण या मार्गावरून नकळत चालू लागतात आणि त्या भयाण मार्गासोबत भविष्याच्या सोनेरी पहाटेऐवजी ते काळोख्या अंधाराला आपलंसं करू लागतात.

कॉलेज लाइफमध्ये एन्जॉयमेंट, मजा-मस्ती हवीच. पार्टीजसुद्धा असाव्यात, पण कुठेतरी त्यांनासुद्धा एक नियमांची चौकट असावी.अति तेथे मातीही एक साधी म्हण म्हटलं सा-यांनाच माहीत आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनात याचा अवलंब करायला मात्र आपण विसरतो. आज 63 वर्षानंतरसुद्धा 150 वर्ष ज्यांनी आमच्यावर राज्य करून होत्याचं नव्हतं करून टाकलं. त्यांच्या वेस्टर्न कल्चरशी सूर जुळावेत यासाठी आपण केवढा तो अट्टहास, केवढी धडपड करत असतो. सांस्कृतिक,पारंपरिक स्पर्धाना चाट देऊन मल्हार, उमंगसारख्या कोटय़वधी बजेटच्या फेस्टिव्हलमध्ये शेवटी होणारे जॅमस काय सांगतात? की आम्ही सगळेच इंग्रजाळलेलो आहोत. आपली संस्कृती आता तितकीशी आपलीशी वाटत नाही जितकी ही पार्टी, पब कल्चरची संस्कृती हॅपनिंग वाटते. शेवटी या सा-यांचं इप्सित काय? हे सगळं कुठे थांबणार? हे प्रश्नसुद्धा आजच्या युवा पिढीच्या भवितव्याप्रमाणे सिगारेटच्या धुरासारखे अधांतरीच राहतात

गेट रेडी फॉर कॉलेज

दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन जीवनाची आतुरतेने वाट बघणारे अनेक विद्यार्थी लवकरच महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. सुरुवातीला धडधडत्या अंत:करणाने कॉलेजच्या आवारात पाऊल टाकल्यावर कॉलेजच्या रंगात असे काही रंगून जातील की पुढची पाच वर्ष कधी सरून जातील हे कळणारच नाही.

एकीकडे टीवाय आणि मास्टर्सची परीक्षा देऊन महाविद्यालय जीवनाच्या आठवणींची शिदोरी घेऊन अनेकांनी आपल्या कॉलेज लाइफचा निरोप घेतला असेल तर दुसरीकडे दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयात सरसावलेले,महाविद्यालयीन जीवनाची आतुरतेने वाट बघणारे अनेक विद्यार्थी लवकरच महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

आईच्या मायेने प्रत्येक गोष्ट खाऊच्या घासाप्रमाणे मुखाशी आणून देणा-या शाळेची साथ सुटली, याची हूरहूर जरी मनात उठत असली तरी दुसरीकडे ताई, दादांकडून आजपर्यंत ऐकलेल्या कॉलेजच्या गमती-जमती, ती सगळी धम्माल, मजामस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार असल्याने एक प्रकारची एक्साइटमेंट नवख्या कॉलेजवीरांच्या मनात आहे. लेक्चर बंकिंग,कॅन्टीनमधली धमाल, कॉलेजमधून मूव्हीला जाणं, आजपर्यंत हे सारं काही फक्तऐकलं होतं. शिवाय यापुढे युनिफॉर्म नसणार मग दरवर्षीसारखे दोन युनिफॉर्म खरेदी करण्याची गरज नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून मिरवायला मिळणार म्हणून मुलांची जरी चंगळ असली तरी पालकांच्या खिशाला दरवर्षीच्या तुलनेने यंदा जास्त फोडणी बसणार आहे, यात काही शंका नाही. कारण दोन किंवा तीन जीन्स अथवा ट्राऊझर्स, त्यावर सूट होणारे टी-शर्ट्स, कृर्ती, त्याला मॅचिंग किंवा शोभेल असे सॅन्डल्स, बॅग्स अशा वेगवेगळ्या शॉपिंगसाठी त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.

शालेय जीवन संपलं की जीवाभावाचे अनेक मित्रमैत्रिणी विभिन्न क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छेपोटी वेगवेगळय़ा वाटा पकडतात. त्यामुळे आजपर्यंत ज्यांच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करत होतो त्यांची साथ सुटल्यावर पुढचा प्रवास एकटय़ानेच करायचा आहे, ही आठवणसुद्धा मनात विचारांचं वादळ उठवते. अनोळखी वातावरण, अनोळखी जग, त्यात सगळा वेगळा अभ्यास.. या सा-या वातावरणात आपलं कसं होणार? हा प्रश्न अधून मनात काहूर माजवत असतो. त्यामुळे थोडासा का होईना पण एक प्रकारचा नव्‍‌र्हस अ‍ॅटॅक आलेला असतो.

बट फ्रेंड्स, नॉट टु वरी, धडधडत्या अंत:करणाने कॉलेज आवारात पाऊल टाकणारे तुम्ही या कॉलेजच्या रंगात असे काही रंगून जाल की पुढची पाच र्वष कधी सरून जातील हे कळणारच नाही. कदाचित अल्पावधीतच जीवाभावाच्या, आपल्याच विचारांच्या कितीतरी मित्र-मैत्रिणी मिळतील. नाटय़मंडळ, वाङ्मय मंडळात रमून जाताना हळूहळू शालेय जीवनातील आठवणी हृदयाच्या एका कोप-यात बंदिस्त होतील आणि मग जेव्हा टीवायचं वर्ष येईल तेव्हा कॉलेज जीवन संपणार ही कल्पनाच करवणार नाही.

पण दिल्ली अभी बोहोत दूर है। सो गाईज, बी बिनधास्त, कॉलेज लाइफ एन्जॉय करायला तयार व्हा. अर्थात एन्जॉयमेंटच्या नावाखाली आपण काहीतरी अयोग्य किंवा अवैध तर करत नाही ना, याची खात्रीही करून घ्या. वाईट व्यसनं आणि प्रलोभनं यापासून दूर राहा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास. तो महत्त्वाचाच आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तोही थोडाफार कराच.. काय, पण टेन्शन घेऊ नका..

सो जस्ट गेट, सेट, गो फॉर कॉलेज.

Tuesday, August 3, 2010

फ्रेंडशिप : अ‍ॅक्च्युअल की व्हर्च्युअल?

बँड्स, ग्रीटिंग, फुलं, व्हाइट टी-शर्ट्स, हातावर मित्र-मैत्रिणींची नावं आणि फ्रेंडशिपच्या हजारो एसएमएससोबत सीसीडीमध्ये टाइमपास.. शाळा-कॉलेज, ऑफिस, बस, ट्रेन, सोशल नेटवर्किंग साइट.. असं मोठं फ्रेंड सर्कल. प्रत्येक ग्रुपसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. इनशॉर्ट फुल टू धमाल. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने पुन्हा आठवणींना उजळा मिळतो. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने मैत्रीच्या वेगवेगळ्या धाग्यांचा घेतलेला वेध!

आजच्या स्पर्धेच्या युगात जय-वीरूची स्कूटवर बसून ये दोस्ती हम नही छोडेंगेअशी गाणी गाणारी मैत्री अभावानेच आढळते. आता मैत्रीचं स्वरूप किंवा तिच्या व्याख्या बदलत गेल्या आहेत. कधी ही मैत्री नकळत होते, कधी ठरवून केली जाते तर कधी बळजबरीने लादली जाते. त्यातच सध्या इंटरनेटवर फ्रेंडलिस्ट वाढवण्यासाठी केली जाणारी मैत्री किंवा प्रोफेशनल मैत्री.. असे सगळे प्रकार बघून एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे आजच्या काळातील ही फ्रेंडशिप अ‍ॅक्च्युअल की व्हर्च्युअल?
  • नकळत होणारी मैत्री
लहानपणी आपण आईचं बोट धरून शाळेत जातो. पण शाळेच्या त्या अवाढव्य वाटणा-या आवारात घाबरत-घाबरत प्रवेश केल्यावर शेजारी बसणा-या त्या मुलांचा किंवा मुलींचा आपल्याला कोण आधार वाटतो. शालेय जीवनात आपली मैत्री अगदीच निखळ असते. तिला गरीब-श्रीमंत, हुशार-ढ, सुंदर-कुरूप असा कुठलाच रंग नसतो. समोरच्याशी त्याच्या गुण-दोषांसकट आपण मैत्री करतो. त्या अल्लड वयातील मैत्री पुढे मात्र क्वचितच टिकून राहते, परंतु एक गोड आठवण म्हणून एका कोपऱ्यात अढळ स्थान निर्माण करून राहते.
  • ठरवून केली जाणारी मैत्री
शाळेतून महाविद्यालयात गेलो की, अनेकदा लेक्चर ब्रेक केल्यावर परीक्षेच्या वेळेला स्कॉलर्सना गाठावं लागतं, त्यांच्याशी फ्रेंडशिप करून, गोड बोलून परीक्षेसाठीचे आयएमपी प्रश्न विचारा.. मग कधी प्रोजेक्ट बनवण्यासाठी ज्यांचे पालक बहुपयोगीआहेत, ज्यांच्याकडे लॅपटॉपआहे, अशा मुलाशी/मुलीशी मैत्री केली जाते किंवा मग कॅम्पसमध्ये आपल्यालासुद्धा कूल समजण्यात यावं याकरिता कॉलेजमधल्या सो कॉल्ड स्टड ऑर वेब्सशी करण्यात येणारी मैत्री म्हणजेच ठरवून केलेली मैत्री असते.
  • जबरदस्तीची फ्रेंडशिप
या मैत्रीला ब-याचदा पालक जबाबदार असतात. आईच्या मैत्रिणीची किंवा बाबांच्या मित्राची मुलगी/ मुलगा तो कितीही डोक्यात जात असला तरीही त्याच्याशी मैत्री करावीच लागते. त्याच्याशी गोड हसून बोलण्याव्यतिरिक्त काही ऑप्शनच नसतो. कधी कधी आपल्या रोल नंबरच्या अरेंजमेंटमुळे आपल्यावर लादला गेलेला आपला लॅब पार्टनर एक्सपरीमेंट, रीडिंग एकत्र करायचे असल्यामुळे याला खुन्नस वगैरे न दाखवता मैत्रीचे सूर आळवण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.
  • इंटरनेटवरील मैत्री..

सध्याच्या काळात मैत्रीत इंटरनेटचं महत्त्वाचं योगदान आहे. शाळेतले किती तरी जुने मित्र-मैत्रिणी, कुठे तरी गर्दीत हरवलेले अनेक चेहरे अवचित एखाद्या वळणावर ऑर्कुट आणि फेसबुकसारख्या माध्यमातून पुन्हा एकदा गवसतात. परंतु काही वेळा अमुक-तमुकच्या फेंड्सपेक्षा माझे फ्रेंड्स जास्त असावेत, या हव्यासापायी ओळखीचे बिनओळखीचे मित्रांच्या मित्राचे अथवा मैत्रिणीचे मित्र, मैत्रिणी सा-यांना आपल्या फेंड्रलिस्टमध्ये अ‍ॅड करण्याची सध्या क्रेझ निर्माण झाली आहे आणि याच क्रेझमुळे निर्माण झालेला मैत्रीचा एक प्रकार म्हणजे हाय-हॅलो फ्रेंडशिप.

अशा काही फ्रेंडशिपच्या प्रकारामुळे आजची फेंडशिप अ‍ॅक्च्युअल की व्हर्च्युअल आहे, असा प्रश्न पडतो. पण हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते,’ वगैरे संकल्पना कधीच काळाच्या आड गेल्या आहेत. कॉलेजमध्ये भेटणारे मित्र वयाच्या साठीतसुद्धा आजही कोप-यातल्या इराण्याकडे भेटतात. पुलाखालून कितीही पाणी वाहून गेलं तरी ही मैत्री तितकीच तरुण असते. मात्र ही गोष्ट मैत्रीचा अर्थ समजून घेण्यावर आहे..

कारण आजही कुठे तरी

मैत्री ही एक आठवण आहे

आयुष्याच्या शिदोरीतली

एक अमूल्य आठवण आहे.

Sunday, August 1, 2010

लोकमान्य टिळक

स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी माल्वाणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक हे भारताचे महान पुढारी होते भारताच्या ह्या नरसिंहाने स्वन्त्र्याच्या चळवळीत अमूल्य योगदान दिले , भारतीयांना स्वन्तात्र्याच्या तळमळीने जागे करण्यात त्यांचा फार मोठा हातभार होता ,अशा ह्या महान नररत्नाचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्हातील चिखल गाव येथे झाला लहानपणा पासून ते हुशार आणि करारी होते अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा स्वभाव होता . लहानपणी १८५६ सालच्या स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या झाशीची राणी , तात्या टोपे ह्याच्या पराक्रमाच्या गोष्टी आजोबांकडून ऐकताना त्यांच्या बालमनावर देशभक्तीचे बीज रोवले गेले , या विरांप्रमाणे आपणही आपल्या भरतभूमिला पर्दास्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असा त्यांनी निर्धार त्याच वेळी निर्धार केला .

BA LLB झाल्यानंतर ब्रिटीश शासनात टिळकांना उत्तम वेतनाची नोकरी मिळाली असती , परंतु त्यांनी तसे न करता आपले सारे जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.इंग्रजांचे अंध अनुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात,पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"टिळकांनी आगरकर, चिपळुणकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' 'टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरुच् नव्हेत्', ' बादशहा ब्राह्माण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.त्यांच्या एका लेख बद्दल सरकार ने त्यांना ६ वर्ष सशक्त कारावासाची शिक्षा ठोठावली परंतु त्या काळात हि टिळकांनी गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला . लोकांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी म्हणून टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती ह्या सारखे सार्वजनिक उत्सव सुरु केले.. ज्यांनी आपल्या पोलादी इच्छा शक्तीचा उपयोग देशाच्या स्वतंत्र साठी केला ज्यांनी आपले सारे जीवन भारत मातेच्या चरणी अर्पण केले अशा तिच्या सुपुत्राचा १ ऑगस्ट १९२० रोजी जीवनदीप मालवला .. मुंबईच्या सरदारगृहात टिळकांचा मृत्यू झाला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चौपाटीपर्यंत निघालेली अंत्ययात्रा मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी समजली जाते.

उण्या पुरा ६२ वर्षाच्या कालावधीत बाल गंगाधर टिळक ह्या नावावर जे जे काही जमा आहे ते पाहून खरच थक्क वायला होते , राजाश्रय सहज सोडणाऱ्या आणि लोकाश्रयावर जगणे पसंत करणाऱ्या ह्या थोर पुरुषास त्याच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने माझे कोटी कोटी प्रणाम ..जय हिंद , जय महाराष्ट्र .